मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

एक तरी ओवी अनुभवावी...!




आज २७ फेब्रुवारी २०१८, मराठीतील ऋषितुल्य कवि विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस! या निमित्ताने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मराठी भाषाप्रेमींची मागणी आहे. अभिजातता म्हणजे काय याची चर्चा आपण येथे वाचली असेल तर अभिजातातेची व्याख्या व्यक्तीसापेक्ष आहे हे आधी मान्य करायला हवे. त्यापुढे जाऊन भाषेला अभिजात दर्जा मिळणे (वा मिळविणे) म्हणजे नेमके काय आणि तो असा मागून मिळत असतो काय याचा सविस्तर उहापोह करता येईल.

राजा शुद्धोदन आणि राणी महामायेचा राजपुत्र गौतमाने त्याला ‘बुद्ध’ म्हणावे म्हणून विपश्यना केली नव्हती, ज्ञानदेवांनी त्यांना ‘माऊली’ म्हणावे म्हणून पसायदान मागितले नव्हते, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ‘जाणता राजा’ म्हणावे म्हणून आज्ञापत्रे लिहिली नव्हती, रवींद्रनाथांना ‘गुरुदेव’ ही पदवी मागावी लागली नव्हती तसेच टिळक ‘लोकमान्य’ आणि गांधीजी ‘महात्मा’ सरकार दरबारी अर्ज करून झाले नव्हते. ज्या गोष्टी सर्वसामान्य माणसे मनोभावे स्वीकारतात आणि अनुकूल लोकाश्रय मिळवून जनमानसात रुजतात त्यासाठी मागण्या, याचना, विनंत्या किंवा अर्ज करावे लागत नाहीत; त्या कळीचे उमलून फुल व्हावे एवढ्या सहजभावाने परिणामास जातात.

अभिजातता संबंधी प्रकटनाच्या समारोपात आम्ही, सन्मित्र डॉक्टर चिंगरे यांचे निरीक्षण, ‘कुठल्याही निर्मिती प्रक्रियेतील प्रामाणिक प्रयत्नांचे सातत्य म्हणजे अभिजातता!’, आणि आम्हाला या विषयाचे प्रतीकात्मक रूपक म्हणून दृष्टांत देणाऱ्या 'वडाच्या पारंब्यां'चा उल्लेख वाचकांस स्मरत असेल. या दोन्हीचा संदर्भ ‘एखाद्या गोष्टीचे जाणीवपूर्वक सातत्य आणि प्रगल्भ समृद्धी तिच्या शाश्वततेकडे प्रवासास अनुकूल ठरते’ हे प्रमेय सुनिश्चित करण्यात सहाय्यभूत ठरावे.

तेव्हा, ‘अभिजात दर्जा’ची ओरड करण्यापेक्षा काही मुलभूत गोष्टी समजून उमजून केल्या तर ‘अमृतातेही पैजा जिंकणारी’ माऊलीची ‘कवतिकाची बोली’ अभिजात झाल्याशिवाय राहील काय? काय आहेत या मुलभूत गोष्टी -

१. मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याचा अट्टाहास त्यांची अवस्था ‘घरका ना घाटका’ अशी करतो हे आता त्या मुलांनाही पूर्णत: कळून चुकले आहे. गुगल सिमेंटिक्सच्या युगात विश्व-भाषेचा बडेजाव जसा उरला नाही तसेच, भारतातील दक्षिण राज्ये आणि रशिया, जपान, जर्मनी अशा बलाढ्य राष्ट्रांचे आपापल्या मातृभाषेवरील निष्ठेने काहीही नुकसान झाले नाही, उलट उत्कर्षच झाला हा इतिहास आहे. तेव्हा मातृभाषेतून शिक्षण हे प्रगतीस मारक नसते उलटपक्षी पूरकच असते हा मानसशास्त्रीय सिद्धांत व त्याची सभोवताली नित्य दिसणारी प्रमाणे मन:पूर्वक स्वीकारली पाहिजेत.

२. मराठी शाळा बंद करण्याऐवजी आधी पालकांना त्यांच्याबद्दल आपुलकी, विश्वास आणि बांधिलकी वाटेल आणि विद्यार्थ्यांना प्रेम, अभिमान आणि कृतार्थता वाटेल असे त्यांचे स्वरूप बदलायला हवे. भाषा हे केवळ माध्यम आहे आणि मूळ उद्दिष्ट ज्ञान मिळविणे हे आहे या विचाराची मशागत केली तर शाळांचे वर्गीकरण हे भाषावार न होता प्रतवार होईल आणि चांगल्या मराठी शाळांकडे अभिजनांचा ओघ सुरु होण्यास मदत होईल. शाळांचे अर्थकारण आणि दर्जा हे आधुनिक युगात आणि नवीन शिक्षणपद्धतीत परस्परावलंबी असल्याने, दर्जावर काम केल्यास अर्थकारण यथावकाश सुरळीत होईल हा विश्वास बाळगूनच काम करावे लागेल.

३. हे झाले धोरणात्मक आणि संस्थात्मक निर्णय आणि त्यांच्या अंमलबजावणीचे, पण नागरिक म्हणून आपली काही जबबदारी आहे की नाही? त्यातील पहिली आणि महत्वाची म्हणजे आपण आपले सर्व व्यवहार मराठीतून करणे आणि त्याची लाज नव्हे तर अभिमान बाळगणे. ज्ञानराज माऊली आणि युगप्रवर्तक जाणता राजा शिवाजी यांच्या भाषेची त्यांच्या वारसांनाच लाज वाटत असेल तर अभिजात दर्जा सोडा, ती भाषा तरी टिकेल काय? बरे, भाषेचे हे उपयोजनही कसे असावे? समर्थ म्हणतात तसे,


शुद्ध नेटके ल्याहावे शुद्ध शोधावे I
शोधून शुद्ध वाचावे चुको नये II


४. दुसरी जबाबदारी म्हणजे जास्तीत जास्त मराठी पुस्तके, शक्यतो विकत घेवून, वाचणे जेणेकरून मराठीत अधिकाधिक दर्जेदार साहित्य निर्मितीस पोषक वातावरण निर्मिती होईल आणि मराठी सारस्वतास अशी काही रत्ने मिळतील कि त्यांचा अनुवाद इतर भाषात होईल. आज अशी किती मराठी पुस्तके आपण सांगू शकतो ज्यांचा अनुवाद इतर भाषांत झालाय?

५. तिसरी आणि महत्वाची कटिबद्धता म्हणजे आपण जे लेखन करतो, अगदी भ्रमणध्वनीवरील संदेशाच्या रुपात का होईना, ते देवनागरीत आणि व्याकरण, विरामचिन्हे आणि केवळ मराठीस लाभलेले चिन्हे यांचा सुयोग्य वापर करून लिहू अशी मनाशी खुणगाठ बांधणे - प्रतिज्ञा, शपथ किंवा आश्वासन नको. विवेकी माणूस आपल्या मनाशी शक्यतो प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो आणि जेवढे व्यासपीठ मोठे तेवढे मोठे आश्वासन देतो आणि जेवढे आश्वासन मोठे तेवढी मोठी त्याची योजना होते, जी फसण्यासाठीच असते! तेंव्हा तसले काही न करता केवळ मनोमन दृढनिश्चय करू या...

दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे II

आज मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून दोन कविता वाचू या, कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची ‘नट’, आणि विंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांची, मराठी भाषा आणि शब्दांचे वैभव आणि सामर्थ्य दर्शविणारी १. 

नट – कुसुमाग्रज

नांदीनंतर
पडदा उघडला
तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो
हजारो रंगीबेरंगी शब्दांनी,
शरीरभर रोरावणा-या
असंख्य आविर्भावांनी
भीतींनी, आशांनी, अपेक्षांनी;
आता
भरतवाक्य संपल्यावर
प्रयाणाची तयारी करीत
मी उभा आहे
रंगमंचावर, एकटा,
समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच
संपूर्ण रिकामा.

मी उच्चारलेले
काही शब्द, अजूनही
प्रेक्षालयातील धूसर
मंदप्रकाशित हवेवर
पिंजारलेल्या कापसासारखे
तरंगत आहेत,
माझे काही आविर्भाव
रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना,
बिलगून बसले आहेत,
मी निर्माण केलेले
हर्षविमर्षाचे क्षण
पावसाने फांद्दांवर ठेवलेल्या
थेंबांसारखे
भिंतींच्या कोप-यावर
थरथरत आहेत
अजूनही.
हा एक दिलासा
माझ्या रितेपणाला,
नाटक संपल्याची खंत-
ती आहेच.
नाटक नव्हे, तीन तासांचे
एक अर्करूप अस्तित्व
संपले आहे.
पण संपले आहे ते फक्त
इथे - माझ्याजवळ.
माझ्या त्या अस्तित्वाच्या
कणिका घेउन
हजार प्रेक्षक घरी गेले आहेत;
मी एक होतो
तो अंशाअंशाने
हजारांच्या जीवनात
- कदाचित स्मरणातही -
वाटला गेलो आहे.


१ – विंदा करंदीकर

अस्तित्वकोनाचा
विकास होऊन
एक दिवस
येतील, येतील
अस्तित्वाच्या
दोन्ही भुजा
एका रेषेत;
जाणीव, जगत
होतील एक;
राहील उभा
काळाचा द्विभाजक
आणि बनेल
विश्व निर्ब्रह्म
सरळ कोनाच्या
साक्षात्कारांत! 

अस्तित्वकोनाचा
विकास साधताना
गरोदर भाषेला
लागतात डोहाळे
सगुण शब्दांचे. 

पाहिजेत शब्द
करडे, काळे
रसाळ, रटाळ
रेखीव, रांगडे
चपळ, लंगडे
प्रगाढ, प्रशांत
पाहिजेत शब्द
जहाल, ज्वलंत 

पाहिजेत शब्द
ओंगळ, ओवळे
सात्विक, सोवळे
चेंगट, हट्टी
तर्कटी, मर्कटी
सुखरूप, स्वादिष्ट
पाहिजेत शब्द
गरोदर, गर्विष्ठ 

पाहिजेत शब्द
बकुळीच्या कुशीतले
दर्याच्या मिशीतले
पाहिजेत शब्दः
पहाटेच्या ओटीतले
थडग्याच्या मिठीतले 

पाहिजेत शब्द
मुसमुसणारे
धुसफुसणारे
कुजबुजणारे
पाहिजेत शब्द:
कडकडणारे! 

पाहिजेत शब्दः
विश्वाला आळवणारे
अणूला उचलणारे
रक्तांत मिसळणारे
गरोदर भाषेला
लागतात डोहाळे
सगुण शब्दांचे 

कारण शब्दांनिच
अमूर्त आशयाचे
मूर्त ध्वनीशी
लागते मंगल
आणि वाढतात
विचार - विकार
वर्गाच्या क्रमाने;
होतात जाणिवा
जागृत, समृद्ध!

बुधवार, २१ फेब्रुवारी, २०१८

मृत्युलेख..!

आज माईआत्याच्या निधनाने ८६ वर्षांचा एक प्रदीर्घ अध्याय आटोपला. आपल्या आजोबांबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची माझी शेवटची कडीही निखळली आणि उरलीसुरली आशाही लोपली. आत्याच्या या शेवटच्या काळातील घटना, त्यांचे संदर्भ आणि त्याचा बौद्धिक स्तरावर कार्यकारणभाव आणि अध्यात्मिक स्तरावर कर्मसिद्धांत याविषयी गेले काही दिवस स्वत:शी चिंतन आणि इतरांशी चर्वतिचर्वण यामध्ये विविध साक्षात्कार झाले. मनुष्यस्वभावाचे अनेकानेक नमुने आणि त्यांची परिस्थितीनुरूप क्षणोक्षणी बदलणारी रूपे पाहून अवाक व्हायला झाले. मानसशास्त्राच्या कितीही अभ्यासानंतर देखील माणसाचे मन ही जर एक खोल अंधारी गुहा असेल तर त्याची बुद्धी ही घनदाट जंगलातील विस्तीर्ण वृक्षाच्या पारंब्या आहेत हा शोध, नवीन नसला तरी, अंगवळणी देखील पडला नाही. हा विषय, 'शास्त्र असे सांगते!' आणि  कर्मकांडाच्या दृष्टीने आजपासून १४व्या दिवशी संपेल आणि आत्या कदाचित फक्त भिंतीवरील चित्र आणि तिच्याच शब्दात 'सठी सामाशी' निघणाऱ्या आठवणीच्या रूपात उरेल, पण या घटनेने पुन्हा एकदा घुसळून वर आणलेले मानवी आचार-विचार-वर्तन-विहार संबंधी प्रश्न आणि त्यांची आंदोलने जेवढी सनातन आहेत तेवढीच अमूर्त तथा कालातीत... 

या निमित्ताने, 'आपण सारे अर्जुन' असे म्हणणाऱ्या वपुंची आठवण होते आणि त्याच धर्तीवर 'आपण सारे अश्वत्थामा' असे म्हणावसे वाटते, प्रत्येकाची जखम फक्त वेगळी आणि ती सांभाळण्याची रीतही वेगळी. या अशाश्वत आणि अनित्य जगण्यात हरेक भळभळणारे ललाट तेवढे शाश्वत! 

आयुष्याच्या संधीकाली कधीतरी प्रकाशित करावी म्हणजे मृत्युलेख म्हणून खपून जाईल अशी कविता आज इथे टाकावीशी वाटतेय कारण अनासक्ती आणि विरक्तीचे महत्व इतके प्रकर्षाने जाणवण्याची संधी कदाचित पुन्हा मिळेल न मिळेल...
   
सकाळी दुपारी संध्याकाळी वेळी अवेळी
भटकायचा इतस्तत: विखुरल्या सारखा
गूढ शोधक नजरेने निरखायचा कणकण
वाटायचा निरुद्देश अन निरर्थकही कधी...

बोलायचा स्वत:शीच आणि कुणाशीही
लोकांना नव्हता वेळ ते जाणून घ्यायला
 कुणी म्हणे हा तर वेडा, कुणाला वाटे तत्वज्ञ
कुणा लेखी संशयित तर कुणी, 'हं! संभावित'

त्याला न तमा न फिकीर, नुसतीच वणवण
आणि विवंचना कधी भुकेल्या जीवांची…
चुकीच्या ग्रहात पडलेल्या आत्म्याने अन
एक दिवस दिली टाकून देहाची लक्तरे थकून

झाडली गोधडी काही आशाळभूत अन काही
लोभी कामचुकारांनी लोचट भूतदयेने जेव्हा
विचारांचा पाडला पाऊस कोंडल्या शब्दांनी
काही अलंकारही होती अजून न वापरलेले...

कुठलाच नव्हता पुरावा त्याच्या असण्याचा
तेव्हा ठरले कि हा ना अ-भूत-पूर्व ना भावी
'विषय संपवा!' म्हणाले सूज्ञ जाणते कुणी
पांढऱ्या पापणीचा म्हातारा म्हणाला… 'कवि!'

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

हरकत..!

व्हॉटसएपवर शेअर झालेल्या या विचक्षण परंतु निनावी कवितेचा रचयिता कोण याचा शोध लागला नाही. युगानुयुगांच्या पुरुषी दांभिकतेवर नेमका प्रहार करणाऱ्या या आशयगर्भ प्रकटनाच्या स्वामित्वाची कुणाला काही कल्पना असल्यास कृपया माहिती द्यावी. विशेष काही नाही, आभार मानायचे आहेत आणि आम्ही आम्हाला समर्पक वाटलेल्या नामकरणासह आमच्या ब्लॉगवर शेअर करण्यास कर्त्याची काही 'हरकत' नाही ना एवढी खात्री हवी आहे. या रचनेने पुन्हा एकदा 'वाचे बरवे कवित्व...'ची प्रचिती आली, बाकी काय...! 


मी विसळत होते उष्टी भांडी..
जेव्हा तू बोलत होतास, 
परिसंवादात 'स्त्री'च्या श्रमप्रतिष्ठेवर..
कुण्या एकीच्या तरी कष्टाची होईल किंमत म्हणून म्हंटल, 
"हरकत नाही"

मला रडवत होता तुझा अबोला,
जेव्हा प्रकाशित होतं होत 
'स्त्री-पुरुष संवादावर'तुझं पुस्तक..
कुणा एका नात्यात तरी बोलका होईल वाद म्हणून म्हंटल,
"हरकत नाही"

मला वेध लागले होते शृंगाराचे,
जेव्हा तू देत होतास बौद्धिक
'स्त्रीच्या भावनांची'व्हावी कदर..
कुण्यातरी 'ती'च्या तरी नजरेला मिळेल होकार म्हणून म्हंटल,
"हरकत नाही"

धूळ खात होत्या माझ्या पदव्या,
जेव्हा तू अभिमानाने वाचली बातमी 
'अर्थशास्त्रातल्या स्त्री'च्या योगदानाची..
एकीच्यातरी प्रमाणपत्राला मिळेल रोजगार म्हणून म्हंटल,
"हरकत नाही"

मी घेतंच होते गोळ्यांवर गोळ्या,
जेव्हा तू आग्रही राहिलास
तुझ्या बहिणीने दोघींवरच थांबावं..
त्यांच्या तरी वाट्याला येऊ नये माझ्या कळा म्हणून म्हंटल,
"हरकत नाही"

मी घरात होत गेले बंदिस्त,
जेव्हा तू झगडत राहिलास
'स्त्री मुक्ती'साठी..
एखादी तरी होईल भोगण्यातून मोकळी म्हणून म्हंटल,
"हरकत नाही"

एकदा बिचकून पाहिलं शेजारच्या घरातल्या कोपऱ्यात,
तर ती ही काढतच होती उष्टी..
तीच्याही हाकेला नव्हती साद..
तीच ही राहून गेलं होतं लाजणं..
तिची ही अधुरी होती स्वप्नं..
तिचे ही होतंच होते गर्भपात..
ती ही तितकीच होती जखडलेली..

हादरले मी..
अन धावतच जाऊन पाहिलं प्रत्येक शहराच्या चौकात,
तर तो ही म्हणत होता ,
हवी स्री-श्रमाला प्रतिष्ठा..
हवी स्त्रीपुरुषात निखळ मैत्री..
हवी स्त्री भावनांची कदर..
हवी अग्रस्थानी स्त्री..
हवी स्त्रीला निर्णयशक्ती..
हवी स्त्री मुक्तच..

सगळीकडे 'फक्त' तोच बोलत होता..
तो 'फक्त'च बोलत होता...

आता मात्र मला  "हरकत आहे"...!

#वास्तविकआयुष्याचीकाल्पनिककथा

रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८

ध्रुव हालतो...?



नीतीचा भोक्ता, मनाचा सच्चा आणि शब्दाचा पक्का माणूस आपले परखड मत कधीही, कुठेही आणि कसेही व्यक्त करण्यास मुळीच कचरत नाही... ते स्वत:बद्दलचे आणि अव्यवहार्य ठरू शकणारे असले तरी! आत्मभान ही मानवी अस्तित्वाची उन्नत पायरी असली, आत्मस्तुती किंवा आत्मवंचना ही आत्मचरित्राचीच ‘स्वान्त सुखाय’ पाने असली आणि उदासीन आत्मपरीक्षण आणि त्याच्या साक्षेपी विश्लेषणाचे काव्यात्म प्रकटीकरण हे प्रसंगी आत्ममग्नतेचे लक्षण वाटले तरी ते अनुभूतीचे भावविश्व जेव्हा वैयक्तिक न राहता वैश्विक होत समस्त मानवांना सामावून घेते तेव्हा त्याचे बदलले परिमाण केवळ एका घायाळ पराभवाचा विषाद न उरता ‘विश्वाचे आर्त’ मांडणारा निषाद ठरतो! अगदी कोवळ्या वयात अशा अथांगतेचे सार उमजण्यास ज्ञानेश्वर जन्मावा लागतो आणि ‘अगदी माझ्याच मनीचे बोल हे...’ असे सर्वसामान्यांस वाटायला लावणारा भाव शब्दात बांधण्यास तो कवि करंदीकर असावा लागतो...

विंदांच्या माझ्या हृदयस्थ कवितांमध्ये मानाचे स्थान असलेली जातक मधील ही आर्त गझल...?

मी ऐकले ध्रुव हालतो

मी ऐकले ध्रुव हालतो, त्याचे काही वाटले;
माझेच काही मागचे माझ्या गळ्याशी दाटले.

विजनातल्या सुपथावरी तुजला दिल्या शपथा किती,
रहदारिच्या रस्त्यावरी ते शब्द आता फाटले.

अयशात होतो धुंद अन् सुयशात झालो सुंद मी;
हरवून माझा ध्यास मी हे काय भलते गाठले.

पंखात होती झेप अन् डंखात होती चेतना;
मी पाय येथे रोवण्या ते पंख माझे काटले.

गर्दीत मी घुसलो किती; जेथे कोणी सोबती.
साथीस उरली सावली... हे सोंग माझे कोठले?

होता कुठे, आला कुठे - तो शाश्वताचा सारथी!
दर्याच सरला मागुती की सांडपाणी आटले?

जातक, १९६५

रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

गझल आरतीचा...


श्रीयुत चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांच्या मातोश्री कोकणातल्या कुठल्याशा गावात खानावळ चालवीत. हे महाशय तेथें गल्ल्यावर बसून कविता करीत. खानावळीत जेवायला येणाऱ्या काही काव्यरसिकांनी त्यांच्या कविता म्हणे चोरून ‘मौज’मध्ये प्रकाशनासाठी ‘आरती प्रभू’ या नावाने धाडून दिल्या आणि त्या चक्क छापून आल्या. एवढेच नव्हे तर रसिकांना खूपच भावल्या देखील आणि मराठी सारस्वताला ‘आरती’ विना हा ‘प्रभू’ गमला...! विंदानी आपल्या या सन्मित्राला उद्देशून एक कविता लिहिली आणि ती वाचतांना गझलच्या अंगाने गेल्यासारखी वाटली म्हणून तिचे नामकरण केले, ‘गझल आरतीचा!’... तोच हा गझल...

निस्तब्ध टिंबाभोवती बिंबावले ज्याचें जिणे
त्याची न निरखा पाऊले; काही अती, काही उणे.

ज्याला अनोखे जाहले हे ओळखीचे चेहरे,
त्याच्या खुळ्या शब्दांतुनी त्याची कथा का शोधणे?

आकाश कातळ जाहले तेव्हाच पूरहि संपला;
धरित परके वाहते; काठास का तें आणणे?

शोधीत गेली जी गती आकाशगंगेची मुळें,
कां तिला या फूटपट्या लाकडाच्या लावणे?

ध्यास नव्हता त्याजला तुमचें भलें करीनसा;
उसनी भलाई कासया पदरांत त्यांच्या बांधणे?

अध्यास ध्यासाचाच तो; श्वास तो असण्यांतला;
उपकार श्वासाचे न या निश्वास सोडुन संपणे.

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

मी...

 

मिटता शून्यवत,
उमलता विश्वरुप मी
धरती जेवढी तेवढाच
पसरतो व्योमी...!