मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

मानवांनो आंत या रे !

आज महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विंदांची ही विश्वाचे आर्त मांडणारी कविता...

मानवांनो आंत या रे !


पर्वतांनो दूर व्हा रे ! सागरांनो दूर व्हा रे !
उघडिलें मी दार माझें; मानवांनो आंत या रे.

वादळांची काय भीती?
तींच माझें गीत गाती;
वादळांना जन्म देती श्वास माझें पेटणारे.

भूक माझी वाढलेली;
प्राण माझा वाढलेला;
वाढलेलें पंख माझें या नभीं ना मावणारे.

कालसर्पाला अतां मी
जिंकिलें जावूनी व्योमीं !
वीज ही रे चोंच माझी, मेघ हे माझी पिसें रे.

आज माझा देह साधी
विश्वऐक्याची समाधी;
कोंडले जातील आतां मानवा या कोंडणारे.

दुर्बलांना, दु:खितांना,
शापितांना, शोषितांना
आज क्षितिजाच्या करांनी देत मी आलिंगना रे.

पर्वतांनो दूर व्हा रे ! सागरांनो दूर व्हा रे !
उघडिलें मी दार माझें; मानवांनो आंत या रे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा