बुधवार, १४ जून, २०१७

करियर...?




काल दहावीचा रिझल्ट (‘निकाल लागला’ याला मराठीत वेगळाच ‘भाव’ आहे!) जाहीर झाला आणि महाराष्ट्रात १९७ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी (शत प्रतिशत?) गुण मिळविल्याचे जाहीर झाले आणि अनेकांची गणितं चुकली! पुलंच्या भाषेत ‘मी पहिल्यापासूनच मार्क्सविरोधी गटात’ असलो तरी ज्यांनी नव्वदीच्या घरात धैर्याने शिरून थेट शंभरी गाठली त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आता शतकी विक्रमवीर आणि घसरलेली क्रमवारी या सगळ्यांपुढे एकच यक्ष प्रश्न भूतासारखा नाचतोय... पुढे काय? What next? इथे समस्त दहावी पास / नापास विद्यार्थी आणि त्यांचे, काही तूर्तास कृतार्थ तर काही व्यथित पण एकुणात सगळेच संभ्रमीत, पालक यांचे एकहाती, एकसूरी आणि एकात्मिक प्रबोधन (किंवा समुपदेशन) करण्यास धजू नये एवढा मी विवेकपूर्ण विनयशील नक्कीच आहे.

तथापि या निमित्ताने; साने गुरुजींची साधना, मुक्तांगण मित्र आणि महाराष्ट्र मंडळ यांच्या एकत्रित प्रयत्नाने जानेवारी २०१७ मध्ये पुणेकरांना एका अप्रतिम अनुभवाचे साक्षीदार होता आले... पुढे जाण्यासाठी, मागे वळून पाहताना... 
 द्रक्ष्याम शीघ्रं संबुद्धं सर्वव्याधिप्रमोचकं।
वैद्यराजं महावैद्यं दुःखितानां चिकित्सकं।।
असे ज्यांचे यथार्थ वर्णन केले आहे त्या एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन डॉक्टरांच्या मुक्त संवादाचा हा कार्यक्रम हा जेवढा प्रेरणादायी होता तेवढाच साक्षात्कारी देखील! कारण यात सहभागी होते ‘मुक्तांगण’चे डॉ. अनिल अवचट, ‘निर्माण’चे डॉ. अभय बंग आणि ‘वेध’चे डॉ. आनंद नाडकर्णी! या तीनही लोकोत्तर (अलीकडे हा शब्द फारसा कुणाला समजणार नाही कारण तशी माणसं हल्ली फारशी घडत नाही आणि जी घडतात ती फेसबुक, whatsapp वर दिसत नाही... असो) पुरुषांशी संवाद साधला तो विवेक सावंत यांनी. 'विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर तळागाळातल्या समूहाच्या उद्धारासाठी झाला पाहिजे आणि कोणताही उद्योग – व्यवसाय अंतिमत: सामाजिकतेच्या दिशेने गेला पाहिजे' शी धारणा असणाऱ्या या विवेकी सावंतांसारखे सगळेच लोक आपले नाव सार्थ करीत जगले तर आयुष्य किती सुंदर होईल... तेही एक असो!

मुद्दा असा की अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या संपूर्ण कार्यक्रमाची (ज्याला सुमारे १५०० श्रोते जीवाचे कान करून अडीच तास स्व पलीकडे म्हणजे काय याची अनुभूती घेत होते) ध्वनिचीत्रफित यू ट्यूब वर उपलब्ध करून जगभरातल्या मराठी भाषिकांची एक मोठीच सोय करून देण्यात आली. शिवाय ‘साधना’च्या अंकात दि. १८ मार्च २०१७ रोजी ही संपूर्ण मुलाखत शब्दांकित करून छापण्यात देखील आली आहे.

सूर्याच्या तेजाचे वर्णन केल्यावर काजव्याने आपल्या टीवल्याशा प्रकाशाचे वर्णन करू नये एवढे व्यवहारज्ञान मला असले (चक्क?) तरी, आपली टिमकी वाजवायची नाही तर पोस्ट सोशल करून उपयोग काय, नाही का? तेव्हा, शनिवार, दि. १९ डिसें. २०१५ ला एस-ओ-एस व्हिलेज पुणे आयोजित करिअर फ़ेअर मध्ये युवामनाच्या 'हौसला अफजाई' साठी अस्मादिकांनी केलेली रचना इथे चिटकवून ठेवतो... तेवढीच वाचकांना रसग्रहणाची संधी!
सौदा इथे सगळ्याचाच
काहीच मिळत नसते फुकट,
यशाला नसतो शॉर्ट-कट अन
वाट सत्याची नेहमीच बिकट…

गुंड असतात मुळात भ्याड
सूज्ञ जमवीत नाहीत झुंड,
अन्यायाविरुध्द कुठल्याही
अन निर्भयतेने थोपट दंड…

कधी उन तर पाऊस कधी
चुकणार ना सृष्टीचे चक्र,
ग्रह-ताऱ्यांना भुलू नकोस
कोण मार्गी, कुठला वक्र…

देव-दानव कुणि नको
निर्लेप जग आयुष्य,
दोघांनाही असूयेने
वाटू दे, व्हावे मनुष्य…!

प्रत्येक क्षणातून तू
शिकून घे नवे काही,
आला क्षण गेला क्षण
हा क्षण फिरुनी नाही…

निर्धारांना चढव धार
प्रयत्नांचे इमले रच,
कितीही वाटले कठीण
खाऊ नको मुळी कच…

स्वप्न बघ आभाळाचे
अन घे गरुडभरारी,
निवडलेल्या वाटेवरून
फिरू नकोस माघारी…

अंधार कितीही दाटला तरी
रात्र संपून पहाट होईल,
रोज नव्याने उगवून सूर्य
गीत वसुंधरेचे गाईल…!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा