बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

लाजरा...!


राजेंद्रकुमार ते सुनील दत्त असल्या न-नटांचे पडद्यावरील दर्शन जिच्या चेहऱ्यातल्या गोडव्याने आणि सहज अभिनायातल्या नजाकतीने सुसह्य केले ती '…बहारोंकी मलिका…' पडद्याआड जात नाही तोवर 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा'यला आसुसलेला कवि ज्याचा '… तुमचं आमचं सेम असतं…' हा विश्वास आम्हाला मजनू व्हायची हिम्मत देऊन गेला… त्यानेही त्याच्या कवितेइतक्याच सहजतेने निरोप घेतला. दृश्यानुभव जरी संग्रहित स्वरुपात शिल्लक असला तरी जिवंत श्रवणानुभव आता पुन्हा नाही आणि पु. लं. चे किस्से 'पीएल असा होता…' सांगणारा आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला शेवटचा माणूसही…


यांनी आम्हांस काय दिले याची जंत्री मोठी असली तरी एका शब्दात सांगायचे तर… आनंद!
आमचे जगणे अनेक तऱ्हेने समृध्द करून गेलेल्या या दोन कलावंतास शब्दसुमनांजली…

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

गीत...!

शनिवार, दि. १९ डिसें. २०१५ ला एस-ओ-एस व्हिलेज पुणे आयोजित
करिअर फ़ेअर मध्ये युवामनाच्या 'हौसला अफजाई' साठी केलेली रचना…
   

सौदा इथे सगळ्याचाच
काहीच मिळत नसते फुकट,
यशाला नसतो शॉर्ट-कट अन
वाट सत्याची नेहमीच बिकट

गुंड असतात मुळात भ्याड
सूज्ञ जमवीत नाहीत झुंड,
अन्यायाविरुध्द कुठल्याही
अन निर्भयतेने थोपट दंड

कधी उन तर पाऊस कधी
चुकणार ना सृष्टीचे चक्र,
ग्रह-ताऱ्यांना भुलू नकोस
कोण मार्गी, कुठला वक्र

देव-दानव कुणि नको
निर्लेप जग आयुष्य,
दोघांनाही असूयेने
वाटू दे, व्हावे मनुष्य…!

प्रत्येक क्षणातून तू
शिकून घे नवे काही,
आला क्षण गेला क्षण
हा क्षण फिरुनी नाही

निर्धारांना चढव धार
प्रयत्नांचे इमले रच,
कितीही वाटले कठीण
खाऊ नको मुळी कच

स्वप्न बघ आभाळाचे
अन घे गरुडभरारी,
निवडलेल्या वाटेवरून
फिरू नकोस माघारी

अंधार कितीही दाटला तरी
रात्र संपून पहाट होईल,
रोज नव्याने उगवून सूर्य
गीत वसुंधरेचे गाईल…!