गुरुवार, १७ सप्टेंबर, २०१५

"ऎकतोयस ना…?"

ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे । कविं कवीनां उपमश्रवस्तमम् । 
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः । शृण्वन्नूतिभिः सीद सादनम् ॥


"बाप्पा, आलास खरा पण मनाची तयारी केली आहेस ना…! 
आता १० दिवस हे मोठे लोक तुझे काय काय करतील माहितेय? 
दागिने वस्त्रे फुलं घालून तुझा श्वास कोंडतील, 
नाका-सोंडेत कशा कशाचा धूर सोडतील, 
तुला नैवेद्य म्हणून काय काय आणतील आणि स्वत:च फस्त करून तुला बनवतील, 
सकाळ संध्याकाळ तुझ्या आरतीच्या नावाने आणि एरवी उत्सवाच्या नावाने ढोल बडवून, सिनेमाच्या गाण्यांच्या गोंगाटाने उच्छाद मांडतील, 
त्यातून तुझे हे सुपाएवढे कान… बघ बाबा कसं सहन करायचं ते…! 
आणि हो बाप्पा, आम्हां मुलांना तुझ्याकडून काहीच नको. 
धम्माल करायला आणि मोदक खायला मिळतात ते बास आहे. 
परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास करायला लागतो, 
तो आम्ही करूच आणि छान मार्कांनी पासही होऊ… 
तुझा आशीर्वाद असतोच याची आम्हाला खात्री आहे. 
पण बाप्पा एक सांगू, तू ना या वर्षी जातांना या मोठ्या लोकांना जरा सुबुद्धी देवून जा.
नाही, तुम्हाला आवडतात आणि परवडतात म्हणून हव्या त्या वस्तू वापरा म्हणावं…
आणि कमवता तर खर्चही करा म्हणावं… चंगळ म्हणून का असेना…
पण याबरोबरच थोडासा विवेकही वापरा म्हणावं… 
लहान तोंडी मोठा घास… पण ही वेळ आणलीच मुळी या मोठ्या माणसांनी
भूक लागली की खाणे ही प्रकृती… भूक नसतांना खाणे ही विकृती आणि 
आपल्यातली अर्धी भाकरी उपाशी माणसाला देणे ही संस्कृती… 
हीच खरी संस्कृती… हा असा धांगडधिंगा म्हणजे संस्कृती नव्हे…
हे सांग त्यांना जरा समजावून… सांगशील ना…?
आम्ही तर बोलूच शकत नाही… आम्हाला काय कळतय? बच्चे आहोत ना आम्ही…!
पण तुझं तर ऎकतील. बाप्पा आहेस ना तू…?
ऎकतोयस ना…?"

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०१५

बाप्पा रे …!


जमविल्या मायेचा सोडून मोह
देशांतरा धावती सारे सान थोर,
प्रवास जिकिरीचा, मुक्काम गूढ
मरण्याहून जीवा, जगण्याचा घोर...

'बाप्पा येणार बाप्पा येणार'
ओरडती सारे दांभिक जन,
भक्ती सरली सक्ती उरली
वर्गणी-खंडणीचे करती धन...

बळीराजा उपाशी म्हणून
'बाप्पा' ना खुश, ना राजी,
'मरणारे मरती आपल्या मरणे'
उत्सवे नाचती निर्ल्लज पाजी...

प्रत्येकाला हवी 'स्पेस' आणि
करमणुकीचे साधन स्वतंत्र,
आस्वादण्या आधी काहीही
'शेअर' करण्याचे अजब तंत्र…

माणसांच्या बेटांत हल्ली
नाही मने जोडणारे सेतू,
संभावित 'विवेकी'ही बघती
पत्रिकेतले मंगळ, राहू-केतू...

विकासाच्या विनाशकारी गप्पात
माणूसपण काय शिल्लक राहील,
मढविलेल्या सालंकृत बाप्पात
नवी पिढी कुठले 'मूल्य' पाहील…?