बुधवार, २६ ऑगस्ट, २०१५

दिवस असे की...!

उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये,
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये...

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार,
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...

असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे,
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...

शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये सर्दी फार,
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये...

कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव,
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये...

कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ,
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये...


असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये...!
- संदीप खरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा